‘सागरशाळा’ : एक दस्तऐवज

गुजरात राज्यातील कच्छ भागात अंजार, मुंद्रा, मांडवी तालुक्यांत नऊ ठिकाणी समुद्रकिनार्‍यावर मच्छीमार मुस्लिमांची वस्ती असते. ज्यांना वाघेर म्हणून ओळखले जाते. जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने ही माणसे आपापल्या गावांत असतात, अन्यथा यांचा रहिवास आणि प्रपंच सहकुटुंब समुद्रकिनारी.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाल्यावर या लोकांच्या मुलांसाठीही शाळा सुरू झाल्या. पण त्या होत्या त्यांच्या मूळ गावी, जिथे ही कुटुंबे केवळ चार महिने राहायची. म्हणजे या मुलांना शाळा नसल्यातच जमा.

मुले किनार्‍यावर आली म्हणजे त्यांना मौज मस्ती करता येईल अशातला भाग नाही. पारिवारिक व्यवसायात त्यांना हातभार लावावा लागतो. रात्री माशांच्या होड्या आल्यावर मासे आणायला जाणे, आणलेले मासे निवडणे, सुकवण्यासाठीचे मासे सुकत घालणे यात मुलांना सहभागी व्हावे लागते. पुन्हा ही कुटुंबे जणू आश्रितासारखीच. सावकाराकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जामुळे मासे त्याच सावकाराला विकण्याची सक्तीची बांधिलकी त्यांना जपावी लागते.

अशा या वातावरणात एके दिवशी काहीतरी विधायक काम करण्याच्या प्रेरणेने झपाटलेला, साने गुरुजींच्या विचारांच्या संस्कारातला एक गोमंतकीय तरुण तिथे पोचतो. गुजरात भूकंपानंतर तेथे युसूफ मेहरअली संस्थेतर्फे चाललेले पुनर्वसनाचे काम पाहण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी तो गुजरातमध्ये थांबलेला. त्यावेळी एकदा बावडीबंदर येथे रुग्णवाहिका सेवेसोबत जाण्याचा त्याला योग येतो. तिथे पहिल्यांदा त्याच्या नजरेस हे विदारक वास्तव येते. कच्छच्या किनार्‍यावर रणरणत्या उन्हात करपून जात असलेले बालपण आणि प्रत्येक लाटेबरोबर वाहून जात असलेले मच्छीमारांच्या मुलांचे भवितव्य. मच्छीमारांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाची फारशी  चिंता नव्हती. जिथे अधांतरी जगतानाच गटांगळ्या खाव्या लागत आहेत तिथे शिक्षणासाठी धडपड करणार तरी कोण ? पण त्या तरुणाच्या मनात इरादा पक्का होतो. या मुलांसाठी काहितरी करायला हवे. पण समोर समस्यांचा आणि अडथळ्यांचा मोठा समुद्र असतो.

पुस्तकाचे मुखपृष्ठ 
पण त्यातून तो वाट काढतो आणि सुरू होतात ‘सागरशाळा’

सेवाभावी संस्थांकडून अथक प्रयत्नांनी  जेमतेम निधी उभा होतो. महिना सहाशें रुपये मानधनावर शिकविण्यासाठी नववी पास मच्छीमार समाजातील एका मुलाला तयार केले जाते. शाळेत मुले येतील म्हणून वाट बघत बसण्यापेक्षा शिक्षण घेऊन मुलांपर्यंत जावे असा विचार ‘सागरशाळां’मागे होता.

पहिली ‘सागरशाळा’ सुरू झाली ती भूकंपग्रस्तांसाठी आणलेल्या व शिल्लक राहिलेल्या एका तंबूत. फळाही नव्हता. शेवटी तिथल्या पाण्याच्या टाकीला फळा बनविण्यात आले व मुले अक्षरे गिरवू लागली. पुस्तकात उल्लेख आला आहे त्याप्रमाणे एकदा तर वर्ग उभारताना लागणारी गोणपाटे गोळा करतानाही नाकीनऊ आले.

‘सागरशाळा’ सुरू झाली. पण एका शाळेने भागणारे नव्हते. मात्र अनेक शाळांसाठी टीम उभारणेही सोपे नव्हते. दळणवळणाची साधने फार कमी, मानधनही जेमतेम, पण सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांतून टीम उभी राहिली.

दुसरे म्हणजे, मुलांना शाळेसाठी बोलवायला जावे तर ‘आमचे काम काय तुम्ही करून देणार’ असे पालकांचे सवाल अंगावर यायचे. त्यामुळे शाळेच्या वेळा या ‘भरती ओहोटी’वर अवलंबून असत.

पण मुलांना नुसते शिकवून भागणारे नव्हते. त्यांचे भवितव्य त्यातून घडायला हवे. तसे असेल तर त्यांच्या शिकण्याला ‘कागदोपत्री’ मान्यता हवी. त्यासाठी अनेक ‘अस्मानी सुलतानी’ संकटांशी सामना करावा लागला. मुलांच्या हजेरीस मान्यता देण्यापासून ते त्यांना परीक्षेसाठी मान्यता मिळवण्यासाठी या तरुणाला ‘गांधीगिरी’चेही प्रयोग करावे लागले. अनेक मुलांकडे जन्मदाखलेच नव्हते. ते करण्याची आवश्यकताच या लोकांना वाटत नव्हती. शेवटी कायद्याचा आधार घेत या तरुणानेच मुलांना ‘जन्म’ दिला. आता त्यांच्या शिक्षणाला कायदेशीर दर्जा प्राप्त झाला होता.

या शाळांत केवळ अक्षरे शिकवून साक्षर करण्याचे काम या शिक्षकाने केले नाही. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेले संस्कारी नागरिक घडविण्याच्या प्रक्रियेच्या या शाळा भाग बनल्या. खोलवर रुतलेल्या रुढींतून सुटका करण्याबरोबरच, भेदाभेट मिटवून धर्म समभावाचा, अंधश्रद्धा - व्यसन निर्मुलनाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. त्यासाठी प्रयोग झाले.

एकदा तर, मुलांना भूत - पिशाच्च काही नसते हे पटवून देण्यासाठी या शिक्षकाने आपल्या अन्य सहकार्‍यांसोबत थेट स्मशानात  भोजनाचा कार्यक्रम केला. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेचे धडे देताना नास्तिकतावाद कुणावरही लादला जाणार नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले.

अशा या सागरशाळा घडवणारा शिक्षक म्हणजे देवेंद्र कांदोळकर.

देवेंद्र कांदोळकर हे गोव्यात एका हायस्कूलात शिक्षक होते.  अठरा वर्षे अध्यापनानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन समाजकार्य करण्याचा निर्णय घेतलला. नोकरीची अजून १४ वर्षे शिल्लक होती. अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. काहींनी त्यांना काही वर्षे बिनपगारी रजा घ्या, म्हणजे हवे तर पुन्हा नोकरीत येता येईल, असा सल्ला दिला. पण ते म्हणतात - ‘नोकरी व पैसा यांचा आणखी मोह होऊ नये म्हणून ते दोर स्वत:च्या हातांनी कापून मी बाहेर पडलो.’

अशातचच पुण्याला ग. प्र. प्रधान यांना भेटायला गेल्यावेळी ते त्यांना आपल्या निवृत्तीविषयी सांगतात. प्रधान सरांच्या सल्ल्यानुसार आपल्या कार्याची दिशा ठरवण्याअगोदर देशात चाललेली समाजकार्ये समजून घेण्याचे ते ठरवतात. त्यानुसार तेे पोचतात गुजरातला. राजकोट येथे. गांधीविचारांतून चाललेले तिथले काम पाहिल्यावर सहज त्यांच्या मनात येते कच्छच्या युसूफ मेहर अली केंद्राचे काम बघून यावे. येथूनच त्यांच्याकडून ‘सागरशाळा’ घडवली जाणार होती.

त्यांच्या या प्रयोगाचे वर्णन त्यांच्या सागरशाळा या पुस्तकात आले आहे. सागरशाळा उभारणीची गोष्ट सांगतानाच कांदोळकर यांनी या पुस्तकात अनेक उपक्रमांची माहिती दिली आहे. गुटखा निर्मुलनासाठी, शिक्षणापासून वंचित स्त्रियांच्या साक्षरता वर्गांविषयी, जाती-धर्म-लिंगभेद नष्ट करण्यासाठीच्या प्रयोगांबाबतही पुस्तकात स्वतंत्रपणे लिहिले आहे.

एखादे कार्य शून्यातून कसे उभे करता येऊ शकते, याची प्रेरणा देणारा सामाजिक कार्याचा एक दस्तऐवज असे त्यांच्या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.



परिशिष्ट : 

पुस्तकाचा ब्लर्ब

गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला. कच्छ जिल्हा उद्ध्वस्त झाला. मुंद्रा तालुक्यात भद्रेश्‍वर हे युसुफ मेहेरअलीचं जन्मगाव. भद्रेश्‍वरहून सात-आठ किलोमीटर दूर या किनार्‍यावर सप्टेंबर ते मे असे आठ - नऊ महिने मासेमार मुस्लीम वस्ती राहते. या वस्तीला पाणी, वीज शिक्षण, रस्ते आरोग्य कसलीही सोय नाही. या वस्तीवरचे तरुण गलबतांवर मासे पकडण्यासाठी जातात आणि किनार्‍यावर वृद्धापासून चार-पाच वर्षांच्या बालकापर्यंत सर्वजण पकडून आणलेली मासळी निवडण्याचे , वर्गवारी करण्याचे काम करतात. देवेंद्र कांदोळकर गोव्याच्या शाळेतला आदर्श शिक्षक. राष्ट्र सेवा दलाचा काार्यकर्ता. भूकंपानंतर कच्छला गेला आणि तिथंच राहिला. त्याच्यातला शिक्षक बेचैन झाला. झोपडीझोपडीत जाऊन पाहणी केली. त्याने सेवा दलाला प्राथमिक मदतीसाठी गळ घातली. गुजरात भूकंपनिधीतून प्राथमिक मदत मिळाली. सेवा दलाची शक्तीही बेताचीच पण कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. डॉ. जी. जी. पारीख पुनर्वसनासाठी जीव पाखडून प्रकल्प मिळवत ‘तेरे देस होम्स’चे प्रतिनिधी अटलबिहारी शर्मांनी युसुफ मेहेरअली सेंटरचा मदतीचा प्रस्ताव मंजूर केला. मुंद्रा, अंजार व मांडवी या तीन तालुक्यांत अकरा शाळा चालतात. शाळेत गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांवरून शिकवलं जातं. हे सर्व करताना आशा-निराशेचे खेळ चालू होते. आता पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. ज्या तर्‍हेने सर्व कामाला समाजमानसात हळूहळू मान्यता मिळते आहे, त्यावरून विश्‍वास वाटतो की या सर्व परिवर्तनाच्या पाऊलखुणा आहेत.

-सुधाताई वर्दे
राष्ट्र सेवा दलाच्या माजी अध्यक्ष

(‘सागरशाळा’ पुस्तकाच्या पहिल्या आवृतीवरील ब्लर्ब : 
प्रकाशक- गोमंतक मराठी अकादमी, पणजी-गोवा; मार्च २००९)


Comments