अंतोनी व्हिवसचे शहर चिंतन

 “आपली शहरे म्हणजे दीर्घ आणि अनेक कालखंडांतून विकसित होत होत साकारलेल्या कलाकृती असतात “ - अंतोनी व्हिवस

शहरे हा आधुनिक काळातील चर्चेचा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण (कधी कधी भीषण आणि उग्र वाटत असले तरी) सत्य आहे किंवा अटळ सत्य बनत आहे.

सध्या ‘तुम्ही बी घडा ना’ हे अंतोनी व्हिवस यांच्या ‘smart city Barcelona’ या पुस्तकाचा सुलक्षणा महाजन आणि करूणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचतो आहे. मोठ्या 17x24 सें.मी. आकारातील 266 पानांचे हे भारदस्त जाडजूड पुस्तक राजहंसने प्रकाशित करून एक सध्याच्या काळासाठी आवश्यक असा दस्तावेज उपलब्ध करून दिला आहे असे वाटले.

अंतोनी व्हिवस हे बार्सेलोना शहराचे उपमहापौर होते. शिवाय स्मार्ट सीटी संकल्पनेबाबत जगभरात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. शहराची उभारणी, घडण, नियोजन या संदर्भातील प्रयोग व त्यामागील चिंतनातून हे पुस्तक घडले आहे. शहरांना जास्तीत जास्त मानवी चेहरा कसा मिळू शकेल व टीकू शकेल असा या प्रयोगांमागील धडपड व चिंतनामागील उद्देश्य दिसतो. 

शहरवासीयांचे त्यांच्या शहराशी संबंध कसे घनिष्ट होऊ शकतील, नियोजन आणि उपयुक्तता यांचा सुमेळ साधून प्रकल्प कसे उभारले जाऊ शकतात, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जनसहभाग, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांशी जोडणी, शहराच्या पारंपरिक स्वरूपाचे जतन-संवर्धन, पारंपरिकता, शहरांचे वैशिष्ट्य, सांस्कृतिक संदर्भ सांभाळून नवीनीकरण, शहर आधुनिक बनवताना सौंदर्यशास्त्राचा विचार जपणे, शहरांतील गच्चपणा कमी करून मोकळेपणा निर्माण करणे, नागरिकांना स्वाभिमानाने व सुरक्षितपणे कसे जगता येईल, इत्यादी अनेक प्रयोगांबाबत विधानं व्हिवस यांनी केली आहे. यातील विशेष म्हणजे हे प्रयोग व्हिवस यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले आहेत तसेच अनेेक प्रयोगांत त्यांचे मार्गदर्शन व सहभाग राहिला आहे. शिवाय अशा प्रकारच्या इतरांच्या प्रयोगांचे आकलनही त्यांनी मांडले आहे.

पुस्तकात व्हिवस यांची विधाने लक्ष वेधून घेतात. उदा-

“शहरे मानवी प्रमाणांशी सुसंगत असावी लागतात. जेव्हा शहरांचा विस्तार माणसाच्या आवाक्याबाहेर जातो, तेव्हा शहर समजून घेणे अवघड जाते. ...उपभोगाच्या आहारी गेलेली शहरे आत्मा आत्मा हरवलेल्या देवालयांसारखी भासतात.”

“वाढती लोकसंख्या सामावून घेत शहरे वाढत आहेत, सुजत आहेत आणि त्याचे नागरी स्वरूप हरवून ती केवळ माणसांचे मोहोळ असलेल्या वस्त्या बनत आहेत, ही माणसे कशापासून तरी दूर पळत आहेत असे वाटते, पण ती कशापासून  लांब पळत आहेत तेच अजून समजलेले नाही.”

“स्मार्ट होणे म्हणजे अवास्तव हाव टाळणे, स्मार्ट होणे म्हणजे माणूस, समाज, निसर्ग यांच्यात अतूट परस्परावलंबन आहे याचे भान येणे. स्मार्ट होणे म्हणजे समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि निसर्ग या सर्वांशी जोडले जाणे.”

“लोकशाहीला अभिप्रेत असलेले प्रगल्भ शहर कधीच भ्रामक समजुती, अंतर्मन, चमकदार आणि अगडबंब प्रकल्प यांच्या माध्यमातून प्रगती करू शकत नाही. त्यासाठी बदल करण्याची महत्त्वाकांक्षा आवश्यक असली तरी बदलांची अंमलबजावणी वास्तववादी प्रकल्पांद्वारे करावी लागते.”

“शहरांचे नियोजन हे चलाख वास्तुरचनाकार आणि नगरतज्ज्ञ यांच्या कंपूने नकाशांवर काही ठिपके आणि बाण दाखविण्यापुरते मर्यादित नसते.”



Comments